नवी दिल्ली : कोरोनाच्या आगामी संकटामुळे येणाऱ्या मंदीचा परिणाम आता ऑटो कंपन्यांवर होताना दिसत आहे. देशातील प्रख्यात कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने यावर्षई जानेवारीपासून आजपर्यंत सुमारे ३०० मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हना नोकरीवरून कमी केले आहे.
कोरोनामुळे आलेल्या मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीची स्थिती गंभीर झाली आहे. महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह डिव्हीजनकडील विक्रीत या आर्थिक वर्षात २७.५२ टक्के घसरण झाली आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण उद्योगाचा विचार केला तर एकूण विक्रीत १३.२ टक्क्यांची घसरण झाली आहे.
कंपनी संलग्न उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितले की, वरिष्ठ स्तरावरील काही मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हनाही या कपातीचा फटका बसला आहे. यामध्ये महिंद्रा मोबिलिटी सर्व्हिसेस सेक्टरचे चेअरमन आणि ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे सदस्य व्ही. एस. पार्थसारथी यांचाही समावेश आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत ३०० एक्झिक्युटीव्हना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रल्हाद राव यांचाही समावेश आहे. ते महिंद्राच्या बिझनेस प्लॅनिंगचे प्रमुख होते.
दरम्यान, याबाबत महिंद्रा अँड महिंद्राच्या सीएचआरओ, ऑटोमोटिव्ह आणि फार्मा सेक्टरचे राजेश्वर त्रिपाठी म्हणाले, कंपनीमध्ये भविष्याच्या अनुषंगाने काम सुरू आहे. आम्ही अधिक दक्षतेने संघटनेच्या स्तरावर योग्य कामांसाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही अनेकांना ग्रुपमधील विविध पदांची ऑफर दिली होती. मात्र, काही प्रकरणांमध्ये आम्हाला कर्मचारी कपातीचा कठिण निर्णय घ्यावा लागला.