मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांनी आगामी गाळप हंगामाची तयारी सुरु केली आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडून साखर कारखान्यांकडून काटामारी केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षात वाढल्या होत्या. या तक्रारींची शासन पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. राज्य सरकार ने सर्व साखर कारखान्यांना वजनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व साखर कारखान्यांना डिजिटल वजन काटे बसविण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार काही साखर कारखान्यांनी डिजिटल वजन काटे बसविण्यास सुरुवात केली आहे. तर काही कारखान्यांनी हा आदेश गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी यावर्षी साखर कारखान्यांचा हंगाम सुरु होण्यापूर्वी त्यांच्या उपयोगातील वाहनांच्या तपासणी प्रमाणित संचालन कार्यप्रणाली (SOP) चा वापर करणे व अशा वाहन काट्यामध्ये Digital Load Cell चा वापर केला आहे कि नाही, याची तपासणी करण्याचे आदेश वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी वैद्यमापन शास्त्र विभागाच्या सह नियंत्रकांना दिले आहेत.