नवी दिल्ली : युक्रेनवरील संकट पाहता संघर्ष समाप्त करण्यासाठी चर्चेला पाठबळ दिले पाहिजे अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली आहे. यासोबतच आपण जगातील आर्थिक संकट कमी करण्याच्या हेतूने भागीदारी सोबत काम करण्याची गरज आहे. युक्रेन-रशिया संघर्षाने भारतीय अर्थव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण परिणाम झाल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेतील चर्चेवेळी मान्य केले. जगभरातील देशांमध्ये कोविड लस पोहोचवल्यानंतर अनेक देशांनी भारताकडे युद्धाच्या संकटादरम्यान गहू आणि साखरेच्या पुरवठ्यासाठी संपर्क साधला होता.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, इतर सर्व देशांप्रमाणे भारतात याच्या परिणामांची तीव्रता जाणून घेत आहे. देशाच्या हितासाठी काय सर्वात महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले जात आहे.
जयशंकर यांनी वाद संपविण्यासाठी चर्चा आणि कुटनीती पुढे करण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. भारत या संघर्षापासून निर्माण होणारी आर्थिक कठीण स्थिती कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि भागीदार देशांसोबत मिळून काम करेल. अर्थव्यवस्थेवरील याचा प्रभाव कमी करण्यासह सहभागी देशांना मदतही केली जात आहे. श्रीलंकेसारख्या शेजारी देशाला आम्ही क्रेडिटवर इंधन, धान्य पुरवठा करीत आहोत. खाद्य सुरक्षा ही महत्वाची बाब आहे. अनेक देशांनी गहू, साखरेच्या पुरवठ्यासाठी संपर्क साधला आहे. आम्ही याबाबत सकारात्मक प्रतिक्रीया दिली आहे. बासमती तांदूळ असो वा इतर प्रकारचे तांदूळ, साखर, गहू या वस्तूंच्या निर्यातीत पहिल्या तिमाहीत खूप वाढ झाली आहे असे त्यांनी सांगितले.