ग्रेटर नोएडा : पुढील पाच वर्षात ऑटोमोबाील उद्योग १५ लाख कोटींचा व्हावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी ग्रेटर नोएडामध्ये मारुती सुझुकी आणि टोयाटो त्सुशो समुहात सरकारकडून मान्यता मिळालेल्या स्क्रॅपिंग पॉलिसीचे उद्घाटन केले. देशातील ऑटोमोबाईल सेक्टरचा सध्याच्या टर्नओव्हर ७.५ लाख कोटी रुपयांचा आहे. यामध्ये ३ कोटी रुपये एक्स्पोर्टचे आहेत. पुढील पाच वर्षात हा उद्योग १५ लाख कोटी रुपयांचा व्हावा असे माझे ध्येय आहे असे गडकरी म्हणाले.
अलीकडेच COP26 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दीष्ट निश्चित करून भारत वाटचाल करीत असल्याचे सांगितले होते. याबाबत गडकरी यांनी सांगितले की, या उद्दीष्टपूर्तीसाठी सरकार सीएनजी, एलएनजी, ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल इंधन, इलेक्ट्रिक वाहने यांचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
ते म्हणाले, इंधनाची आपली आयात ८ लाख कोटी रुपयांची आहे. पुढील पाच वर्षात ती २५ लाख कोटी रुपयांवर पोहोचू शकते. अमेरिका, ब्राझील आणि कॅनडात फ्लेक्स इंधनाचा वापर केला जात आहे. तेथे ते १०० टक्के पेट्रोल अथवा १०० टक्के इथेनॉलचा वापर करतात. केंद्र सरकारने तांदूळ, मक्का, धान्यापासून बायोइथेनॉल बनविण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने पेट्रोल पंपाप्रमाणे इथेनॉल पंप सुरू करण्याचे ठरवले आहे. देशातील सर्व लोकांसाठी हे फायदेशीर ठरेल.
प्रदूषणापासून मुक्ततेसाठी ते उपयुक्त आहे. देशातील आदिवासी, कृषी क्षेत्रासाठी ते चांगलेच आहे. यावेळी गडकरी यांनी स्क्रॅपिंग युनिटची सुरुवात केली. हे धोरण ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले.