कुशीनगर : जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि ०२३८ या उसाच्या प्रजातीवर पडलेला रोग यामुळे गेल्या तीन वर्षात १२ लाख क्विंटल ऊस वाळून खराब झाला अशी माहिती सहाय्यक संचालक ओमप्रकाश गुप्ता यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांची हानी झाली असून चार हजारांहून अधिक छोट्या शेतकऱ्यांनी ऊस शेती सोडून दिली आहे, असे गुप्ता म्हणाले.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खड्डा विकास गटातील ब्रिजलाल गावात सोमवारी उत्तर प्रदेश ऊस शेतकरी संस्था आणि प्रशिक्षण केंद्र पिपराइच यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुप्ता म्हणाले की, गळीत हंगाम २०१८ मध्ये १९ हजार तर २०२१ मध्ये १४ हजार शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊस विक्री केली आहे. शेतकऱ्यांनी को.एल. १४२०१, ९४१८४, कोसी ११४५३, १३४५२, कोसा १३२३५ या प्रजातीच्या उसाची लागवड करावी. अर्धा लिटर नॅनो युरिया १२५ लिटर पाण्यात घोळून त्याची फवारणी करावी. यातून उत्पादन वाढेल आणि खर्चही कमी होईल. कृषी संशोधक डॉ. बी. के. मिश्रा यांनी सांगितले की, किटकनाशकांच्या अधिक वापराने पाणी, माती, हवा प्रदूषण वाढत आहे. त्यापासून बचावासाठी शेणाचा वापर करावा. ऊस संशोधक डॉ. विवेक सिंह यांनी सांगितले की, लाल सड रोगावर कोणताही उपाय नाही. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. यावेळी ऊस पर्यवेक्षक अरुण कुमार तिवारी, वीरेंद्र सिंह, राजेंद्र यादव, नरेश कुमार, संदीप पाठक, हरिलाल, हरिशंकर, यासीन, जगरनाथ, रामप्रीत, रामजी, होसिल साहनी आदी उपस्थित होते.