नवी दिल्ली : भारताला २०२५ च्या अखेरनंतर युरिया आयात करण्याची गरज भासणार नाही असे मत केंद्रीय रसायन उद्योग आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केले. पारंपरिक युरिया आणि नॅनो युरियाचे देशांतर्गत उत्पादन देशाची वार्षिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी राहील अशी अपेक्षा आहे असे ते म्हणाले. सद्यस्थितीत देशात पारंपरिक युरियाचे उत्पादन २६० लाख टन आहे. तर देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी ९० लाख टन युरियाची आयात केली जाते. ते म्हणाले की, आमचे अनुमान आहे की, आम्ही २०२५ पर्यंत युरियाबाबत आत्मनिर्भर होवू शकतो. आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही. पारंपरिक आणि नॅनो युरियाचे उत्पादन देशांतर्गत मागणी पेक्षा अधिक होवू शकेल. पारंपरिक युरियाची उत्पादन क्षमता ६० लाख टनाने वाढवली जाईल असे मंत्र्यांनी सांगितले. तर नॅनो युरियाचे उत्पादन दरवर्षी ४४ लाख बाटल्या (प्रती ५०० मिलीलिटर) होण्याची अपेक्षा आहे. हे उत्पादन २०० लाख टन पारंपरिक युरियाइतके असेल.
टीव्ही९हिंदी डॉट कॉमवरील वृत्तानुसार, मंत्री मांडविया यांनी सांगितले की, नॅनो युरियाचा वापर अधिक होत आहे. तरल पोषक तत्व असल्याने मातीचे आरोग्य चांगले राहण्यासह पिकांचे उत्पादनही वाढत आहे. मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयात कमी झाल्यास भारताच्या ४०,००० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होवू शकते. नॅनो युरियाची एक बाटली एक पोते युरियाइतकी असते. त्याच्या वापराने माती, पाणी आणि हवा प्रदूषणाचा स्तर घटू शकतो. पारंपरिक उत्पादनातून खतांचा वापर अधिक होतो. सध्या नॅनो युरियाचे उत्पादन पाच कोटी बॉटल्स प्रती वर्ष आहे. मुख्य सहकारी कंपनी इफ्कोने बाजारात नॅनो युरिया सादर केले आहे. याचे व्यावसायिक उत्पादन गुजरातमधील कलोल येथे इफ्को युनिटमध्ये २०२१ पासून सुरू झाले आहे.