कोलंबो : भारताने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लागू केल्यानंतर अनेक साखर आयातदार देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भारताच्या मर्यादित साखर निर्यातीच्या निर्णयाने शेजारील देश श्रीलंकेवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जर थायलंडकडून साखर आयात करावी लागली तर बाजारात साखरेचे दर वाढू शकतात, असा दावा तेथील साखर आयातदारांनी केला आहे. थायलंडवरून साखर आयात केल्यास एक किलो साखरेच्या दरात श्रीलंकन चलनात ५० रुपयांची वाढ होवू शकते.
भारताने साखरेची निर्यात रोखल्याने आणि इतर कारणांनी येथील बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. युक्रेन संकटानंतर भारताने साखर, गव्हाच्या निर्यातीवर मर्यादा लागू केली आहे. मात्र, बांगलादेश, म्यानमार, मालदीव सह अन्य देशांनी निर्बंध घटविण्यासाठी राजनैतिक रुपात हस्तक्षेप केला आहे. श्रीलंकेतील साखर आयातदारांनी सरकारकडे या विषयावर तोडगा काढण्यासाठी राजकीय हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.