लखनौ : उत्तर प्रदेशातील साखर उद्योग तथा ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले की, कारखान्यंमध्ये गुणवत्तायुक्त घाऊक प्रमाणात विकली जाणारी साखर आता सर्व रिटेल केंद्रांतही उपलब्ध केली जाईल. राजधानी लखनौमधील डालीबाग येथील ऊस संशोधन केंद्राच्या परिसरात बुधवारी त्यांनी साखरेच्या रिटेल विक्री केंद्राचे उद्घाटन केले. मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले की, साखर कारखान्यांमध्ये उत्तम गुणवत्तेची साल्फरलेस साखर व सफेद प्लांटेशन शुगरचे दरवर्षी ९५ लाख क्विंटल उत्पादन केले जाते. सरकारने बंद कारखाने पुन्हा सुरू करण्याचे, त्यांची क्षमता वाढविण्याचे काम केले आहे. निजामाबाद गजरौला आणि छातामधील बंद कारखाना सुरू करण्याचे काम गतीने सुरू आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अप्पर मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखान्यांतील साखरेची खास ओळख निर्माण व्हावी यासाठी युपी सहकारी शर्करा असे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. ऊस संशोधन केंद्राच्या परिसरात हे रिटेल विक्री काऊंटर सकाळी ११ ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू राहील. मुख्य व्यवस्थापक रमाकांत पांडे यांनी सांगितले की, महामंडळाच्या पिपराईच आणि मुंडेरवा कारखान्यात उत्पादित सल्फरलेस शुगरला बाजारात अधिक मागणी आहे. आतापर्यंत ही साखर केवळ ५० किलोच्या पॅकिंगमध्ये मिळत होती. आता ती पाच किलोचे पॅकेट तसेच पाच ग्रॅमच्या सॅशेमध्येही मिळेल.