नवी दिल्ली : आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात एक एप्रिल ते १५ नोव्हेंबर या कालावधीत १.०२ कोटी करदात्यांना १.१९ लाख कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. आयकर विभागाने गुरुवारी ही माहिती दिली.
आयकर विभागाने ट्वीट केले आहे की, केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (सीबीडीटी) एक एप्रिल ते १५ नोव्हेंबर या कालावधीत १.०२ कोटीहून अधिक करदात्यांना १,१९,०९३ कोटी रुपयांहून अधिक परतावा दिला आहे. १,००,४२,६१९ प्रकरणांमध्ये ३८०३४ कोटी रुपयांचा रिफंड व्यक्तिगत करदात्यांना दिला आहे. तर १,८०,४०७ प्रकरणात ८१,०५९ कोटी रुपये कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनामुळे आता ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न फाइल करण्याची मुदत देण्यात आली आहे. गेल्या अर्थसंकल्पात एआयएसची घोषणा करण्यात आली होती. तीही आता लागू करण्यात आली आहे. इतर स्त्रोतांपासूनचे उत्पन्न करदाते लपवतात. आता करदाते आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यापूर्वी एआयएस प्रमाणित करतील. आयटीआर फायलिंगची प्रक्रिया सुलभ करण्याचे काम सुरू असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले.