पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना दर ४ महिन्यांनी दोन-दोन हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना आतापर्यंत १२ हप्ते देण्यात आले आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला १३ वा हप्ता पाठवला जाऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, छत्तीसगढ हे सुद्धा कृषी प्रधान राज्य आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान भाजपच्या खासदार गोमती साय यांनी पीएम किसान योजनेच्या राज्यातील लाभार्थ्यांच्या संख्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
आज तकमधील वृत्तानुसार, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, राज्यात २७,४३,७०८ शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी दिला जातो. १२ वा हप्ता मात्र फक्त १९,७५,३४० शेतकऱ्यांना देण्यात आला होता. आता केवायसी प्रक्रिया आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर १३ व्या हप्त्यामध्येही शेतकऱ्यांच्या संख्येत घट होवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर शेतकरी यासाठी संपर्क करू शकतात.