नवी दिल्ली : दिल्लीत किमान बारा वर्षानंतर सप्टेंबरच्या एका दिवसातच सर्वाधिक पावसाची नोंद झाली. शहरातील हवमान केंद्रांनी बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांमध्ये ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद केली. शहरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसानंतर सखल भागात गुडघ्याइतके पाणी साठले. तर अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात १२५.१ मिमी पाऊस होतो. म्हणजेच दिल्लीत या महिन्याच्या पहिल्याच दिवशी एकूण महिन्याच्या ९० टक्के पाऊस झाला आहे. खासगी हवामान एजन्सी स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पालावत यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे मान्सूनचा ट्रेंडही बदलत आहे. ते म्हणाले, गेल्या चार ते पाच वर्षामध्ये पावसाच्या दिवसांची संख्या कमी झाली आहे. आणि खराब हवामानाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आम्ही पावसाच्या कालावधीत तीव्र आणि कमी कालावधीची नोंद करतो. अनेकवेळा फक्त २४ तासात १०० मिमी पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी एवढा पाऊस होण्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागत होता.
आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सफदरगंज वेधशाळेत बुधवारी सकाळी गेल्या २४ तासात ११२.१ मिमी पावसाची नोंद झाली. बारा वर्षात ही सर्वाधिक आहे. लोधी रोड, रिज, पालम आणि आयानगर वेधशाळेतही अनुक्रमे १२०.२, ८१.६, ७१.१ आणि ६८.२ मिमी पाऊस झाला आहे. दिल्लीत मंगळवारीही दुपारपर्यंत ८४ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक भागात पाणी साठले होते. आज संध्याकाळपर्यंतही थांबून थांबून पाऊस होईल अशी शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. सात सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा कालावधी असेल असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जोरदार पावसामुळे जमिनीतील भूजल पातळी वाढविण्यासाठी उपयोग होत नसल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. पावसामुळे प्रदूषण कमी होते. मात्र, पावसाच्या दिवसांचा कालावधी कमी झाल्यामुळे वार्षिक हवेची गुणवत्ता बिघडते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link