नवी दिल्ली : भारताने लसीकरणाची १०० कोटींचा टप्पा गाठल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था गतीने पुढे सरकत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे अनुमान सकारात्मक असल्याचे पंतप्रधानांनी देशातील नागरिकांशी संवाद साधताना सांगितले. देशभरात फक्त गुंतवणूक वाढली नसून युवकांना नव्या नोकऱ्या उपलब्ध होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्टार्टअपसाठी उच्चांकी गुंतवणूक झाली आहे. त्यातून युनिकॉर्नची उभारणी होत आहे. स्थानिक स्तरावर मॅन्युफॅक्चरिंग वाढले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी देशी उत्पादने खरेदी करावी असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे मेड इन इंडिया उत्पादने खरेदी करण्याचे अभियान राष्ट्रीय स्तरावर गतिमान करण्याची गरज आहे. व्होकल फॉर लोकलला सपोर्ट केला पाहिजे. मेड बाय इंडिया उत्पादने वाढवण्याची गरज आहे.
कोविड महामारीवेळी भारताच्या खरेदी क्षमतेवर शंका उपस्थित केली जात होती. मात्र आमच्या फार्मा सेक्टरने सर्वांच्या शंकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. जगभरातील नेत्यांनी भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन केले आहे असे पंतप्रधान म्हणाले. आगामी काळात सणांच्या दरम्यान लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.