नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांनी पिकांचे होणारे बारमाही नुकसान पाहता मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या कापूस आणि सोयाबीन शेतीऐजी ऊस शेतीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. वर्धा जिल्ह्यातील मांडवा गावातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांना धाम नदी आणि मोती नाल्याच्या जिर्णोद्धाराची पाहणी केली.
टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार गडकरी यांनी सांगितले की, ते महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, विशेषत: कोल्हापूर, सोलापूर, सांगलीतील आपल्या काहीजणांच्या यशस्वी शेतीची उदाहरणे मांडू इच्छितात. विदर्भात ७५-१०० टनाहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या काही शेतकऱ्यांची उदाहरणे देऊन गडकरी म्हणाले, यातून शेतकरी समृद्धीच्या मार्गावर चालू शकतील.
मात्र, टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार गडकरींच्या या मताशी कृषी तज्ज्ञ, कार्यकर्ते आणि शेतकरी असहमत आहेत. विदर्भात पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पीक चांगले यऊ शकणार नाही. जर विदर्भातील शेतकऱ्यांनी ऊस शेती सुरू केली तर, त्यातून भूजल स्तर अधिक खालावेल. या भागात पिकवल्या जाणाऱ्या कापूस, सोयाबीन व डाळी अशा पिकांच्या तुलनेत उसाला अधिक पाणी लागते. त्यामुळे ऊस शेती संकट निर्माण करू शकते असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कृषी तज्ज्ञ विजय जावंधिया यांनी सांगितले की, ऊस हे पाणी भरपूर घेणारे पिक आहे. ते विदर्भासाठी उपयुक्त नाही. याशिवाय साखर कारखाने १० ते १५ किमी अंतरात असतील तरच वाहतूक फायदेशीर ठरते. अन्यथा त्याचा शेतकऱ्यांना वाहतूक खर्चाचा फटका बसेल. त्यामुळे राज्याच्या या भागात ऊस पिक आणि साखर कारखाने यशस्वी ठरलेले नाहीत.