गोरखपूर : उत्तर प्रदेश राज्य महामंडळाच्या पिपराईच कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये २ लाख २९ हजार १२५ क्विंटल सल्फरलेस साखरेची निर्मिती केली आहे. या साखरेचे मूल्य जवळपास ८० कोटी रुपये आहे. सध्या सुरू असलेल्या हंगामात कारखान्याने २४ लाख ६४ हजार क्विंटल उसाचे गाळप केले आहे. ८ हजार शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीच लाभ दिला आहे. याशिवाय या हंगामात साधारणपणे २००० लोकांना प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. पिपराईच साखर कारखान्यात लवकरच डिस्टिलरी प्लांट बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल. याबाबत पर्यावरण मंत्रालयाकडून क्लिअरन्स घेतला जात आहे असे सूत्रांनी सांगितले.
या कारखान्याने चालू हंगामात ८००० शेतकऱ्यांच्या ८४ कोटी रुपये किंमतीच्या उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत २५ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. तर उर्वरित बिले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना बिले देण्यात अडचण येऊ नये म्हणून कारखान्याने ५ कोटींच्या मोलॅसिसचे उत्पादन केले आहे. तर १७ हजार ७४ मेगावॅट वीज उत्पादन करुन ८ कोटी रुपयांची विज ग्रीडला विकली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१७ मध्ये पदग्रहण केल्यानंतर पिपराईच परिसरात नवा साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला होता.