महाराष्ट्रात कोल्हापूर नंतर आता नागपूर विभागातही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम समाप्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. काही दिवसांत इतर विभागातील कारखानेही आपले कामकाज बंद करतील.
महाराष्ट्राच्या साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीनुसार, १३ मार्च २०२२ पर्यंत राज्यातील १२ साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. सध्या कोल्हापूर विभागातील ११ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर नागपूर विभागातील एका कारखान्याने गळीत हंगामा आटोपता घेतला आहे.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये १३ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १०३९.४७ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १०७४.३५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३४ टक्के आहे.
नागपूर विभागात या हंगामात ४ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला. आतापर्यंत ३.९६ लाख टन ऊस गाळप करून ३.३८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.