बाजपूर : चालू गळीत हंगामाचे सत्र आज समाप्त करण्याच्या कारखाना प्रशासनाच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी कारखान्यातील प्रशासकीय भवनात मुख्य ऊस अधिकाऱ्यांची भेट घेतली. शेतामध्ये अद्याप ऊस शिल्लक असून आणखी दोन ते तीन दिवसांची मुदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केी.
याबाबत जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय भवनात सीसीओ डॉ. राजीव अरोरा यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. गेल्या काही दिवसांपासून ऊस समितीकडून अतिशय कमी तोडणी पावत्या देण्यात आल्या मात्र, आता अचानक १०-१२ पावत्या एकदम दिल्या जात आहेत. एवढ्या कमी काळात ऊस तोडून तो कारखान्याला पाठवणे हे शेतकऱ्यांसाठी अशक्य काम आहे. यादरम्यान कारखाना प्रशासनाने हंगाम समाप्तीची घोषणा केली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अद्याप ऊस शिल्लक आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस मुदत देऊन कारखाना सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. जर वेळेवर ऊस कारखान्याने घेतला नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरू शकते. यावेळी सीसीओ अरोरा यांनी यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. भारतीय किसान युनियनचे विभाग अध्यक्ष प्रताप सिंह संधू, बिजेंद्र सिंह डोगरा, सुनील डोगरा, हरमीत सिंह नोनू, तेजपाल सिंह, नवतेज सिंह, विनीत त्यागी, बबलू आदी उपस्थित होते.