कोलंबो : श्रीलंकेत वाढत्या आर्थिक संकटात महागाई आणि कमजोर झालेल्या रुपयामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. श्रीलंकेत आर्थिक मंदीमुळे इंधन, अन्नधान्य, औषधे खरेदी करण्यासाठी अनेक तास रांगेत थांबावे लागत आहे. अनेकदा तर दुकाने, सुपरमार्केटमध्ये रांगेत थांबूनही टंचाई भासत आहे.
वन इंडिया डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, श्रीलंकेत तांदूळ आणि पीठ १९० ते २०० रुपये किलो दराने मिळत आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, भाज्यांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. तांदूळ, गहू २२० रुपये किलो आहे. एक किलो साखर २४० रुपये किलोने मिळत आहे. तेल ८५० रुपये लिटर आहे. एका अंड्याची किंमत ३० रुपये आहे. एक किलो दुध पावडर १९०० रुपये किलोने मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर १७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्याची महागाई २५ टक्क्यांनी वाढली आहे. अन्नधान्याच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. औषधे आणि दूध पावडरची प्रचंड टंचाई जाणवत आहे. त्यामुळे जनतेचा रागही वाढला आहे. राजधानीसह देशाच्या अनेक भागात आंदोलने सुरू आहेत.