महाराष्ट्र: शेतातील उभा ऊस पेटवून शेतकऱ्याची आत्महत्या

औरंगाबाद/बीड: राज्यातील एका शेतकऱ्याने ऊस तोडणीसाठी होत असलेल्या विलंबामुळे पिकाचे नुकसान होण्याच्या भीतीने बुधवारी आत्महत्या केली. उपलब्ध माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील 32 वर्षीय शेतकरी नामदेव आत्माराम जाधव यांनी बुधवारी आपल्या शेतातील ऊसाला आग लावली आणि नंतर आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या एका नातेवाईकाला फोनही केला होता. आपले उभे पीक वेळेवर गाळपासाठी कारखान्याला जाऊ शकत नसल्याने त्यांना नुकसान होण्याची भीती सतावत होती असे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,या घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे सकाळी घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधिकारी म्हणाले, “शेतकरी नामदेव आत्माराम जाधव यांची दोन एकर शेती आहे. त्यात त्यांनी ऊस लावला होता. सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतात जाऊन उभ्या असलेल्या ऊसाला आग लावली. नंतर त्यांनी शेजारच्या गावात राहणाऱ्या आपल्या एका नातेवाईकाला फोन करून ऊस गाळपासाठी कारखान्यात जात नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले”.

फोन केल्यानंतर नामदेव जाधव यांनी नायलॉनच्या दोरीने कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here