आसाममध्ये पुराचा कहर, २० जिल्ह्यांतील २ लाख लोकांना फटका, रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत

नवी दिल्ली : आसाममध्ये जोरदार पावसाने २० जिल्ह्यांमधील जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. पुराचा फटका २ लाख लोकांना बसला आहे. सततच्या पावसाने अनेक जिल्ह्यांतील रस्ते व रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, २० जिल्ह्यांतील २ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. भूस्खलनामुळे अनेक जिल्ह्यांतील रस्ते, रेल्वेचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याबाबत दैनिक अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, एएसडीएमएने म्हटले आहे की, आतापर्यंत २० जिल्ह्यांतील ४६ महसूल सर्कलमधील ६५२ गावांना पुराचा फटका बसला. कछार जिल्ह्यात पुरामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. तर दीमा हसाओमध्ये भूस्खलनामुळे तिघांचा मृत्यू झाला. पुरात १,९८,२४८ लोकांना फटका बसला. होजईमध्ये ७८,१५७ आणि कछारमध्ये ५१,३५७ लोकांना पुराचा फटका सहन करावा लागला. सततच्या पावसाने लखीमपुर, नगांव, होजाई या जिल्ह्यांतील रस्ते, पूल उद्ध्वस्त झाले आहेत. कछार जिल्हा प्रशासनाने ५५ निवासी शिबिरे, १२ मदत वितरण केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये ३२,९५९ पूरग्रस्त दाखल आहेत. न्यू हॉफलांग रेल्वे स्टेशन पाण्यात बुडाले असून १८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here