पार्वतीपुरम : आंध्र प्रदेशमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचा मुद्दा आता तापला आहे. जन सेना पार्टीने (JSP) YSRCP सरकारवर हजारो शेतकऱ्यांची ऊस बिले थकविल्याचा आरोप केला आहे. या शेतकऱ्यांनी पार्वतीपूरम मान्यम जिल्ह्यातील एनसीएस शुगर्सला ऊस पुरवठा केला आहे.
याबाबत द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळावेत या उद्देशाने साखर कारखान्याच्या जमिनींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोप जेएसपीचे नेते चंदाका अनिल आणि वंगला दलिनायडू यांनी केला. मात्र, सरकार शेतकऱ्यांना पैसे देण्यात अपयशी ठरले आहे. दलिनायडू यांनी सांगितले की, सरकारला या लिलावावेळी जमीन खरेदी करणाऱ्या बोलीदात्यांनी धनादेश दिले आहेत. तरीही सरकारकडून शेतकऱ्यांना ऊसाची थकीत बिले देण्यात आलेली नाहीत. सरकारने सर्व थकबाकी त्वरीत देण्याबाबत त्वरीत पावले उचलावीत, अन्यथा आम्ही या मुद्यावर निदर्शने करणार आहोत, असा इशारा दलिनायडू यांनी दिला आहे.