भारताने या गळीत हंगामात साखर निर्यातीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चालू गळीत हंगामात ९० लाख टनापेक्षा अधिक साखर निर्यातीचा अंदाज आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) बंदरांकडून मिळालेल्या सूचना आणि बाजारातील रिपोर्टनुसार, आतापर्यंत ८५ लाख टनसाखर निर्यातीसाठी करार करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कलावधीत ४३.१९ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. याशिवाय, मे २०२२ मध्ये साधारणतः ८-१० लाख टन साखरेची निर्यात केली जाणार आहे. इस्माला चालू गळीत हंगामात ९० लाख टनापेक्षा अधिक साखर निर्यातीची अपेक्षा आहे. गेल्या हंगामात ७१.९१ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती.
साखर उत्पादनाचा विचार केला तर आतापर्यंत देशात १५ मे पर्यंत ३४८.८३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, मागील हंगामात या कालावधीत ३०४.७७ लाख टन साखर उत्पादन झाले होते.