खड्डा : आयपीएल ग्रुपच्या खड्डा साखर कारखान्याची ऊस गाळप क्षमता वाढविण्यात येणार आहे. या कारखान्याच्या इथेनॉल प्लांट उभारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या उत्कर्षाची दारे खुली होणार असून रोजगार निर्मितीस मदत होणार आहे. सध्या या साखर कारखान्याची ऊस गाळप क्षमता १७ हजार क्विंटल प्रतीदिन आहे. या विभागातील उपलब्ध ऊसाच्या तुलनेने ही क्षमता कमी आहे. त्यामुळे कप्तानगंज, गडौरा, रामकोला, हाता, बागहान आदी साखर कारखान्यांना ऊस मिळतो. गेल्या गळीत हंगामात खड्डा साखर कारखान्याने १७ लाख ८९ हजार ४९९ क्विंटल उसाचे गाळप करून शेतकऱ्यांना ६२ कोटी ५७ लाख १३ हजार रुपयांची ऊस बिले दिली आहेत. आता साखर कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट करून ३५,००० क्विंटल प्रतिदिन करण्याची योजना आयपीएलच्या वरिष्ठ स्तरावर मान्य झाली आहे.
हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी सरकारने इथेनॉलच्या निर्मितीला प्रोत्साहन दिल्यानंतर खड्डा साखर कारखान्यात इथेनॉलच्या निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली. हा प्लांट दररोज ६० केएलपीडी (६० हजार लिटर) इथेनॉल तयार करेल असे सांगण्यात आले. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३५ हजार क्विंटलपर्यंत वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे. लवकरच अंमलबजावणी सुरू होईल असे कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक कुलदीप सिंग यांनी सांगितले.