नवी दिल्ली : केरळमध्ये मान्सूनच्या प्रवेशापूर्वीच्या हालचाली दिसून येत आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पाश्चिमात्य विक्षोभामुळे उत्तर भारतातील राज्यांतील वातावरणातही बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये हलक्या पावसामुळे तापमानात घसरण दिसून आली आहे.
याबाबत मनीकंट्रोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमडीने सांगितेल की, २७ मेपासून मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. इतर राज्यांतही हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मच्छिमारांना शुक्रवारपासून तीन दिवस अरबी समुद्रात जावू नये असा इशारा दिला आहे. आयएमडीने सांगितले की, २७ ते २९ मे २०२२ या कालावधीत ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. आयएमडीने कच्छ, जामनगर, पोरबंदर आणि द्वारका जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांसाठी खास निर्देश दिले आहेत. गुजरातच्या काही जिल्ह्यांत हलका पाऊस होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासोबतच राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहील असे आयएमडीने सांगितले आहे.