नवी दिल्ली : मान्सून यावर्षी वेळेपेक्षा आधीच दाखल होणार असा अंदाज वर्तविला गेला होता. जरी मान्सून अपेक्षित वेळेपेक्षा लवकर दाखल झाला असला तरी आता मान्सूनचा वेग मंदावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राजवळ मान्सूनचा वेग कमी झाला असून, त्यामुळे देशातील विविध भागात तो ६ दिवस उशिराने दाखल होत आहे. मान्सूनला उशीर झाल्यामुळे यंदा ३८ टक्के पाऊस कमी झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील बांदा आणि फतेहगड सर्वाधिक ही उष्ण ठिकाणे राहिली आहेत. तरी मात्र, या दिवसांत उन्हाळ्याची झळ शिगेला पोहोचली आहे. यावेळी १० जूनच्या आसपास मान्सून उत्तर प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये आणखी २ दिवसांपर्यंत लोकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे, तर मधुबनी, दरभंगा, सुपौल, अररिया, किशनगंज, सहरसा, मधेपुरा, पूर्णिया, कटिहार, भागलपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याबाबत कृषी जागरण डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा आणि इतर लगतच्या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. त्यानंतर मान्सून वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील जनता गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. सोमवारी दिल्लीतील अनेक भागात पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर राहिला. यावेळी देशातील अनेक भागात लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सून वेळेवर न आल्यास शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन बिघडणार आहे. वेळेवर पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना इतर साधनांवर अवलंबून राहावे लागते. ज्यात शेतकर्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. परिणामी शेतकर्यांची आर्थिक स्थिति अजून बिकट होईल.