कानपूर : देशातील इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी त्याच्या दरात सुधारणा करण्याची गरज आहे. यातून उद्योजक इथेनॉल उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित होतील. या अनुषंगाने ग्राहक व्यवहार, अन्न तथा सार्वजनिक वितरण खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, याबाबत १० जून रोजी दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्रीय मंत्र्यांनी बुधवारी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (NSI) प्रशिक्षणासह साखर संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. केंद्राच्या उद्घाटनानंतर बोलताना त्या म्हणाल्या की, इन्स्टिट्यूटच्या व्हिजननुसार अल्कोहोल तंत्र, शर्करा व्यापार व्यवस्थापन आणि ब्रेव्हरेज तंत्रज्ञान याबाबतचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात आहे.
एनएसआयचे संचालक प्रा. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, इतर फीड स्टॉकपासून इथेनॉल तयार करण्याचे तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रा. डी. स्वेन यांसह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड, डीसीएम श्रीराम लिमिटेड, दालमिया भारत शुगर्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड, उत्तम शुगर मिल्स लिमिटेड, धामपूर बायो ऑर्गेनिक्स लिमिटेड, बिर्ला ग्रुप ऑफ शुगर इंडस्ट्रीज, बलराम शुगर मिल्स लिमिटेड, दि सेकसरिया विस्वा शुगर फॅक्टरी लिमिटेड, हरिनगर शुगर मिल्स लिमिटेड, टिकौला शुगर मिल्स लिमिटेड, द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड, गोविंद शुगर मिल्स लिमिटेड या १२ साखर कारखान्याच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.