नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी शुगर रिफायनरी आणि इथेनॉल उत्पादक श्री रेणुका शुगर्सने सांगितले की, त्यांना सुमारे २० टक्के महसूल इथेनॉलमधून मिळतो. इथेनॉल उत्पादन क्षमता दुप्पट झाल्यास तो महसूल साधारणतः ३०-३५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. CNBC-TV18 ला दिलेल्या एका मुलाखतीत श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही आमची क्षमता दुप्पट करू, तेव्हा इथेनॉलपासून आमचा महसूल एकूण महसुलाच्या तुलनेत जवळपास ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा मला विश्वास वाटतो.
इथेनॉल हे ऊस आणि उर्वरीत फीडस्टॉकपासून तयार होणारे अक्षय्य इंधन आहे. साखर कारखान्यांकडील अतिरिक्त उसाचा वापर करण्यासाठी भारत सरकारने कंपन्यांना इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहित केले आहे. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. त्याचा वापर वाहनांमध्ये इंधनाच्या रुपात केला जाऊ शकतो.
कंपनीने सांगितले की, श्री रेणुका शुगर्सने आपली इथेनॉल क्षमता वाढविण्यासाठी ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आणि आता ही योजना पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आली आहे.
CNBC-TV18 ला दिलेल्या एका मुलाखतीत बलरामपुर शुगर मिल्सचे मुख्य वित्तीय अधिकारी, प्रमोद पटवारी यांनी सांगितले की, आम्ही १९ कोटी लिटर इथेनॉल क्षमता स्थापित केली आहे. आणि आम्ही ही क्षमता वाढवून ३५ कोटी लिटरपर्यंत नेणार आहोत. दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजने इथेनॉल क्षमता 240KLPD (किलो लिटर प्रतीदिन) केली आहे.