सांगे : संजीवनी साखर कारखाना बंद असल्यामुळे या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा नारळ आणि सुपारी लागवडीकडे वळवला आहा. परिणामी राज्यातील ऊस उत्पादनात गेल्या सात वर्षापासून हळूहळू घसरण दिसून येत आहे. साखर कारखाना अनिश्चित काळासाठी बंद आहे. गोव्यातील शेतकऱ्यांकडून किरकोळ प्रमाणात उत्पादित करण्यात आलेला ऊस कर्नाटकमध्ये पाठवला जातो.
संजीवनी कारखाना देखभाल-दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. आणि त्यानंतर खराब मशीनरी बदलण्याची गरज असल्याचे सांगत कारखाना पुन्हा सुरू करण्याकडे पाठ फिरवण्यात आली. नंतर नवीन मशीनरी बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, त्याच्यावर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. जेव्हा कारखाना पूर्णपणे कार्यरत होता, तेव्हा गाळप क्षमता टिकववण्यासाठी शेजारील राज्यांतून ऊस आयात करण्यात येत होता.