नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाड जिल्ह्यात अनके ठिकाणी पाणी साठल्याने दळणवळणावर याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. नद्यांचा जलस्तर वाढला आहे. पुढील पाच दिवस गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग, तेलंगणा, कर्नाटकचा किनारपट्टी व दक्षिण भाग, केरळमध्ये जोरदार पाऊस तसेच वादळी वाऱ्यासह वीज कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केरळमध्ये सहा जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इंडिया डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, दिल्लीत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळी आणि बुधवारी चांगला पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारीही ढगाळ वातावरण राहील. हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. बुधवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील २४ तासात पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. ५ ते ८ जुलै या कालावधीत या भागात जोरदार पाऊस कोसळेल. तर ७ आणि ८ जुलै रोजी पंजाब, हरियाणा, चंडीगढ-दिल्लीत पाऊस कोसळेल. सहा जुलै रोजी पश्चिमी उत्तर प्रदेश; ८ जुलै रोजी पूर्व राजस्थान आणि आठ जुलैपर्यंत पश्चिमी राजस्थानमध्ये पावसाची शक्यता आहे. गुजरात, उत्तराखंडलाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.