मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा कहर सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने आगामी पाच दिवसांसाठी राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रीय राहील अशी शक्यता वर्तवली आहे. याचा परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर सर्वाधिक दिसून येणार आहे. यादरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रासोबत विदर्भ, मराठवाड्यातही जोरदार पाऊस पडेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारामध्ये ८ जुलैपर्यंत रेड अलर्ट आहे. मुंबई आणि ठाण्यात १० जुलैपर्यंत ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आयएमडीने ठाणे, मुंबई, पालघर आणि परिसरासाठी आगामी काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. बुधवारी सांताक्रूझमध्ये १९३ मिलिमिटर तर कुलाबामध्ये ८४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. चालू हंगामात आतापर्यंत सांताक्रूझमध्ये ९२६ मिलीमिटर आणि कुलाबामध्ये ८४२ मिलिमिटर पाऊस झाला आहे. मान्सूनने जोर पकडल्यानंतर तापमानात गतीने घसरण झाली आहे. सांताक्रूझमध्ये कमाल तापमान २६.७ तर किमान तापमान २४.८ डिग्री सेल्सिअस राहिले. तर कुलाब्यात कमाल २७ आणि किमान २४ अंश सेल्सिअस तापमान राहिले. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागांपासून शहरांपर्यंत रस्त्यांवर चार-चार फूट पाणी भरल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाले. नदी, नाले दुथडी भरून वाहात आहेत. अनेक गावांत पुरासारखी स्थिती आहे. मुंबईत पावसामुळे बुधवारी रस्त्यांवरुन ऑटो रिक्षा गायब झाल्या. लोकांना चालत वाटचाल करावी लागली. वसई-विरारमध्ये पाणी साचल्याने लोकांना अडचणीचा सामना करावा लागला आहे.