मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने पाऊस सुरू आहे. शनिवारीही राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने पालघर, ठाणे, नाशिक, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील विविध भागात नऊ ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शुक्रवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच होता.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला गेला आहे. नागपुरात कमाल तापमान ३० तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. वातावरण ढगाळ असेल. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. वातावरण ढगाळ असेल आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये कमाल २९ तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. येथेही ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो.