गेल्या काही दिवसांत मान्सूनच्या पावसाने अनेक राज्ये बेहाल झाली आहेत. ओडिशामध्ये पूर-पावसामुळे लोक हवालदिल झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांतील १,७५७ गावांतील ४.६७ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. राज्यात कमी दबावामुळे झालेल्या पावसाने पुराची स्थिती गंभीर बनली आहे. अशातच १९ आणि २० ऑगस्ट रोजी ओडिशामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस थांबल्यानंतर आणि कटकजवळीत मुंडाली बॅराजमध्ये पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतरही राज्यात महा नदीतील पूर स्थिती गंभीर आहे.
आजतकमधील वृत्तानुसार, कटक जिल्हा सद्यस्थितीत सर्वाधिक पूरग्रस्त आहे. बांकी, दामपाडा, बादामा, नरसिंहपूर, तिगिरीया आणि अठागढ विभागातील अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत. ६०,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी निवास आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. पाण्याचे पाऊचही देण्यात आले आहेत. जगतसिंहपूर, पुरी, केंद्रपाडा, कटक जिल्ह्यात मिन मिनरल वॉटर प्लांट बसविण्यात आले आहेत. गरज भासल्यास शाळांमध्ये निवासाची व्यवस्था केली जाईल. दरम्यान, पुढील २४ तासात आणखी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.