बागपत : उत्तर प्रदेश सरकारने गेल्या पाच वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर एक लाख ८१ हजार कोटी रुपये जमा केले आहेत, असे प्रतिपादन कृषी मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केले. बागपतच्या दौऱ्यावर आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या विषयावर बोलताना त्यांनी, गळीत हंगामापूर्वी जर शेतकऱ्यांची एक रुपयाचीही थकबाकी राहिली तर कारखान्याला टाळे ठोकले जाईल, असा इशारा कारखानदारांना दिला. बजाज समुहाच्या कारखान्याने थकवलेल्या ऊस बिलांबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे दिले गेले पाहिजेत, असे ते म्हणाले.
पंजाब केसरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी यावेळी चौधरी चरण सिंह यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या आधी कोणीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मांडणी करीत नव्हते. पण आज प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांविषयी चर्चा केली जाते. आम्ही सर्वांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीचे मिशन पुढे नेण्याची गरज आहे. जे लोक पिछाडीवर राहिले आहेत, त्यांना आपल्यासोबत आणण्याची गरज आहे.