नरसिंहपूर : नरसिंहपूरमधील गाडरवारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर ऊस पिकावर निसर्गाचा कोप झाल्याची स्थिती आहे. एकमेव नगदी पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेले दहा महिने ऊस शेतात उभा असला तरी सततच्या पावसाने अडचणी वाढल्या आहेत. या पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार नरसिंहपूरमध्ये एकूण शेतीपैकी ३० टक्के क्षेत्रात ऊस पिक घेतले जाते. ऑक्टोबर महिन्यापासून नव्या हंगामाला सुरुवात होईल. परंतु गेल्या काही दिवसांत सतत पाऊस सुरू आहे. गाडरवारामध्ये पंधरवड्यापूर्वी एका दिवसात चार इंच पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे ऊस पिक भुईसपाट झाले. त्यानंतर पिकाची वाढ खुंटली आहे. याशिवाय पाण्यात असलेल्या उसावर बुरशीचा फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी उसावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना बाजारातून किटकनाशके घेवून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, बाजारात याचे दर अधिक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढला आहे.