नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडे एक सप्टेंबरपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ४,८३२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. हा आकडा या महिन्याच्या अखेरीस समाप्त होणाऱ्या गळीत हंगाम २०२१-२२ साठीचा आहे. दरम्यान, अन्न तथा ग्राहक व्यवहार खात्याच्या राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या म्हणण्यानुसार, एकूण थकबाकीच्या ८६.२७ टक्के अथवा ३०,३६८ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्र्यांनी बहुजन समाज पक्षाचे (बसपा) खासदार कुंवर दानिश अली यांना आठ सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. त्यानंतर हे पत्र सोशल मीडियावरही प्रसारित करण्यात आले आहे. ऊस हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत गृहित धरला जातो. खासदार अली यांनी पाच ऑगस्ट रोजी लोकसभेतही ऊस थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, वर्ष २०२१-२२ मध्ये (ऑक्टोबर-सप्टेंबर) एकूण देय रक्कम ३५,२०१.२२ कोटी रुपये आहे. त्यापैकी साखर कारखान्यांनी ३०,३६८.७३ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.