अमरोहा : शेतकऱ्यांनी ऊस खरेदी केंद्र बदलण्याची मागणी करत ऊस समिती कार्यालयासमोर आंदोलन केले. विभागीय अधिकारी जाणूनबुजून त्रास देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जर हे ऊस खरेदी केंद्र स्योहारा साखर कारखान्याकडून काढून नारायणपूर साखर कारखान्याशी जोडले नाही तर, बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, स्योहारा विभागातील शेतकरी मंगळवारी बाजार समितीत पोहोचले. तेथे त्यांनी ऊस खरेदी केंद्र बदलण्यात आले नसल्याबद्दल आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही हे केंद्र बदलावे अशी मागणी करत आहोत. बान प्रथम, द्वितीय, आवी हफीजपूर आणि फाजलपूर ही केंद्रे स्योहारा कारखान्याकडून काढून घेऊन नारायणपूर कारखान्याला जोडण्याबाबत ऊस सचिव तथा जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, आता अधिकारी आमचे म्हणणे ऐकण्यास तयार नाहीत. ८ सप्टेंबर रोजी बैठकीत याला मंजुरी दिली गेली होती. मात्र, अमरोहाच्या ऊस समिती सचिवांनी याची नोंद रजिस्टरमध्ये केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दरम्यान, ऊस उपायुक्तांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी मुरादाबादला बोलावले असून तेथे समस्या सोडविली जाईल असे सांगण्यात आले.