मेरठ : जिल्हाधिकारी दीपक मिणा यांनी मेरठ जिल्ह्यातील दौराला, सकौती, किनौनी मवाना, नगलामल, मोहिउद्दीनपूर हे साखर कारखाने तसेच हापूडमध्ये असलेल्या सिंभावली साखर कारखान्याच्या खरेदी केंद्राद्वारे देण्यात आलेल्या ऊस बिलांचा बैठकीत आढावा घेतला. गळीत हंगाम २०२१-२२ मधील उर्वरीत ऊस बिले शेतकऱ्यांना तातडीने द्यावीत, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मोहिउद्दीनपूर आणि किनौनी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांना देण्यात आला.
पत्रिकामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाधिकारी मिणा यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस हापूडमधील साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक अनुपस्थित राहिले. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सर्व सहा कारखान्यांच्या प्रशासनाला २०२२-२३ या हंगामातील ऊस गाळपाचे नियोजन करावे, ऊस वाहतूक व्यवस्थेचे तसेच कारखान्याच्या खरेदी केंद्रापासून गेटपर्यंतच्या वाहतुकीबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या. आगामी गळीत हंगामातील कामाविषयी देखभाल, दुरुस्तीच्या कामांविषयी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी विविध कारखान्यांचे महा व्यवस्थापक आणि जिल्हा ऊस अधिकारी उपस्थित होते.