सहारनपूर : जिल्ह्यातील सहा साखर कारखाने ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कारखान्यांतील देखभाल, दुरुस्तीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामेही लवकरच पूर्ण केली जातील. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा लवकर गाळप हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न ऊस विभागाचा आहे. त्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांनी कारखान्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवले आहे. जिल्ह्यातील देवबंद, गांगनौली, शेरमऊ, गागलहेडी, नानौता, सरसावा या सहा कारखान्यांची हंगामाची तयारी ऐंशी टक्के पूर्ण झाली असल्याचे ऊस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्यावर्षी नानौता साखर कारखाना जिल्ह्यात सर्वात आधी सुरू झाला होता. त्यापाठोपाठ देवबंद कारखान्याचा हंगाम सुरू झाला. आता ऊस विभागाने कारखाने सुरू होण्याचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू होईल. कारखान्यांना उर्वरीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात यावेळी १.२१ लाख हेक्टरमध्ये ऊस पिक आहे असे जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विदेवी यांनी सांगितले.