हरिद्वार: धनौरी कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील ऊस पर्यवेक्षक तसेच शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये ऊसाचे उत्पादन कसे वाढवावे आणि उत्पन्न वाढीसाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आयटीसीच्या मशीन उज्वल भविष्य या मोहिमेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेत कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ विनोद कुमार चौधरी यांनी उसावरील किड, रोगांची ओळख तसेच त्यांना रोखण्यासाठी कोणते उपाय करावेत याबाबत माहिती दिली.
हिंदूस्थान समाचारमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कार्यशाळेत पिकांच्या पाणी व्यवस्थापनाबाबतही माहिती देण्यात आली. कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी पुरुषोत्तम कुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टरमध्ये ऊस पिक लागवड करण्यात आली आहे. यातील ९० टक्के ऊस ०२३८ या प्रजातीचा आहे. जर या वाणाला किड, रोगाचा फटका बसला तर शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी आधीच काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. इतर प्रजातीचा ऊसही या किडीपासून सुरक्षित ठेवावा अशी सूचना देण्यात आली. यासाठी ऊस लागण करतानाच बीज प्रक्रिया योग्य पद्धतीने करावी, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी उसाचे पाचट जाळू नये असे आवाहन डॉ. उमेश सक्सेना यांनी केले. यावेळी किरण टम्टा, रणधीर सैनी, राहुल चौधरी, गणपत सिंह, अमित बेलवाल, राकेश कुमार, विपुल सैनी, रीना देवी आदी उपस्थित होते.