नवी दिल्ली : देशभरातील आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता १७ ऑक्टोबर रोजी जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटी ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पाठवले आहेत. शेतकरी सप्टेंबर महिन्यापासून १२ व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होते. मात्र, पडताळणीच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. आता दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ही भेट दिली आहे.
आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये २००० रुपयांचा हप्ता पाठविण्यात आला आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तरीही तुमच्या खात्यामध्ये १२ व्या हप्त्याचे पैसे आले नसतील, तर घाबरून जावू नका. हप्ता न मिळाल्यास तुम्ही सरकारच्या अधिकृत pmkisan-ict@gov.in या ई मेलवर संपर्क साधू शकता. किंवा पीएम किसान योजनेची हेल्पलाइन नंबर- १५५२६१ अथवा १८००११५५२६ (Toll Free) किंवा ०११-२३३८१०९२ वर संपर्क करू शकता. जर तुम्ही योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर १२ वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जावू शकतो.