देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यांना पिकांच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (पीएम किसान), किसान क्रेडिक कार्ड अशा योजनांतून त्यांना मदत केली जात आहे. यांदरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्नात भर पडावी यासाठी एका योजनेवर काम सुरू केले आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकेल.
मनीकंट्रोल डॉट कॉमवरील वृत्तानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्व बँकांना शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. किसान क्रेडिट कार्डअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाईल. शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी तीन लाख रुपयांचे शॉर्टटर्म लोन दिले जाते. किसान क्रेडिट कार्डवर दिलेल्या कर्जावरील व्याजासाठी सरकारकडून काही प्रमाणात अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी व्याज भरावे लागते. प्रसार माध्यमातील वृत्तांनुसार, अर्थमंत्री सीतारमण यांनी किसान क्रेडिट कार्डचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल याविषयी त्यांनी चर्चा केली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले की, अर्थमंत्र्यांनी याबाबत बैठक घेतली असून मच्छिमार तसेच दूग्ध व्यावसायिकांना किसान क्रेडिट कार्ड देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.