शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने अनेक आर्थिक सुधारणा केल्या आहेत. त्या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सुरू आहेत. यादरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात करण्यात आली होती. शेतकऱ्यांना या योजनेत सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये दिले जातात. मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना या सन्मान निधी शिवाय शेतकरी कल्याण योजनेतूनही मदत देण्यास सुरुवात केली आहे.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेश सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ४,००० रुपये मदत दिली जाते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना १०,००० रुपये वार्षिक मदत मिळत आहे. शेतकरी कल्याण योजना ही राज्य सरकारची योजना आहे. यात शेतकऱ्यांना २०००-२००० रुपये दिले जातात. सहा महिन्यांच्या अंतराने हे पैसे मिळतात. मे महिन्यात या योजनेतून पेसै पाठविण्यात आले. आता डिसेंबर महिन्यात पुढील हप्ता देण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेतील शेतकरी हा हप्ता मिळविण्यास पात्र आहेत.