बारां: बारां जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गव्हाची सेंद्रीय शेती फायदेशीर ठरली आहे. सुरुवातीला यापासून मिळणारे उत्पादन कमी होते. मात्र, आता त्यात हळूहळू वाढ होत आहे. शेतकऱ्यांचा याकडे कल वाढल्याने जिल्ह्यात आता शेकडो एकर जमिनीवर दोन हजार क्विंटलहून अधिक सेंद्रिय गव्हाचे उत्पादन होत आहे. सेंद्रीय गव्हाच्या चपातीचा स्वाद ब्रेडसारखा गोड असतो. यासोबतच ही चपाती दीर्घकाळ मऊ राहते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पत्रिकामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, नेमिचंद नागर हे शेतकरी गेल्या सात वर्षांपासून सेंद्रीय शेती करतात मागणी अधिक झाल्याने त्यांनी आता आपले लागवड क्षेत्र दुप्पट केले आहे. इतर राज्यांतूनही सेंद्रीय गव्हाला मागणी आहे. सुरुवातीला ४ ते ५ क्विंटल प्रती एकर उत्पादन मिळत होते. दोन वर्षात ते आठ क्विंटलपर्यंत पोहोचले. गव्हाच्या नेहमीच्या दराच्या तुलनेत याची दुप्पट दराने विक्री होते असे त्यांचे म्हणणे आहे. तर कृषी विभागाचे उप संचालक अतिश कुमार शर्मा यांनी सांगितले की, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. २०१९ मध्ये विभागवार शेतकरी मेळावे आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी सेंद्रीय शेतीसोबत २५०० शेतकरी जोडले गेले होते. बाजारात याची मागणी अधिक असल्याने दरही चांगला मिळत आहे.