पुणे : गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील ऊस पिकावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे चालू हंगामात साखर उत्पादन घसरून १२४ लाख टन होईल, अशी शक्यता आहे. हे उत्पादन अनुमानापेक्षा खूप कमी असेल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात उच्चांकी १३७.२८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. या वर्षी पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर दिसून येत आहे.
याबाबत, PTI मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, गेल्या हंगामात उच्चांकी साखर उत्पादनामुळे मराठवाड्यातील काही कारखाने जून महिन्यापर्यंत सुरू होते. यावर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी १३८ लाख टन साखर उत्पादनाचे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. आता त्यात कपात करून हे अनुमान १२४ लाख टन करण्यात आले आहे. गळीत हंगामसुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर समाप्त होईल. राज्यात सद्यस्थितीत १९९ कारखाने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप मार्च अखेरपर्यंत आणि मराठवाड्यातील कारखान्यांचे गाळप मे अखेरपर्यंत समाप्त होईल.