धारवाड : कर्नाटक ऊस उत्पादक संघाने शेतकऱ्यांच्या समस्यांप्रती राजकीय पक्षांच्या उदासिनतेबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी सर्व गावांमध्ये ‘रैथारा नादिग, जागृति कादगे’ (किसान जागृकता मार्च) चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संघाचे अध्यक्ष कुरूबुर शांतकुमार यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मागण्यांचा एक जाहीरनामा तयार केला आहे. जो पक्ष या मागण्यांची पूर्तता करण्यास सहमत आहे आणि या मागण्यांचा समावेश आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात करेल, अशा पक्षाचे समर्थन केले जाईल.
ते म्हणाले, कोणताही राजकीय पक्ष आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, आपली वचनबद्धता दर्शविण्यासाठी पुढे आलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना प्रश्न विचारले पाहिजेत. सर्व गावात रॅली काढली जाईल. ३० एप्रिलपर्यंत ती सुरू राहिल. शांतकुमार म्हणाले की, गुन्हेगार, भू-माफिया, साखर सम्राट, शिक्षण संस्थाचालक भरपूर पैसे खर्च करून निवडणूक लढवतात आणि लोकांचे शोषण करतात.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये उमेदवारांना पराभूत करण्याची आणि सरकार पाडण्याची क्षमता आहे आणि राजकीय नेत्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे.
डॉ. स्वामीनाथन यांच्या शिफारशींच्या आधारावर सर्व पिकांसाठी किमान समर्थन मूल्य निश्चित करण्यासाठी कायदा बनवण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पन्न हमी योजना, शेतकऱ्यांना दिवसा विनाखंड १२ तास वीज पुरवठा, शेतकरी कर्जमाफी, CIBIL स्कोअर विचारात न घेता सर्व राष्ट्रियिकृत बँकांकडून शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज, पिक विमा योजनेचा विस्तार, ऊस पिकासाठी योग्य एफआरपी आणि शेतकऱ्यांना इथेनॉल उत्पादन करणे तसेच ट्रॅक्टर्ससाठी इंधन रुपात त्याचा वापर करण्याची परवानगी देणे या मागण्यांचा यात समावेश आहे.