मे महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे. अवकाळी पावसाने काही ठिकाणच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी हा पाऊस म्हणजे संकट ठरले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आगामी काही दिवसात देशभरात अशीच स्थिती दिसू शकते. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे लोकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळेल.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, स्कायमेट हवामान एजन्सीने दिलेल्या सूचनेनुसार आज जम्मू काश्मीर, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि तामिळनाडूत हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर सिक्किम, आसम, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेशातील पूर्वेकडे आणि विदर्भ, तेलंगणा, हरियाणात हलका ते मध्यम पाऊस पडेल. याशिवाय, केरळ, कर्नाटकचा आतील भाग, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागासह दिल्ली एनसीआरमध्ये हलका पाऊस पडेल. बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, उर्वरीत पूर्वोत्तर भारत, मराठवाडा आणि राजस्थान तसेच गुजरातमध्ये एक ते दोन ठिकाणी हकला पाऊस दिसू शकतो. याशिवाय काही ठिकाणी गारपिट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसात हवामान विभागाने हिमाचल प्रदेशसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शिमला, कांगडामध्ये गेल्या २४ तासात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असून राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.