लातूर : जिल्ह्यातील औसा येथील मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने यंदा तब्बल चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेली दहा वर्षे बंद असलेला हा साखर कारखाना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरु झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारखाना प्रशासनाकडून आता कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रशासनाने ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरु करण्याचे नियोजन सुरु केले आहे.
कारखाना कार्यक्षेत्रात यंदा सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिन १२५० मेट्रिक टन इतकी आहे. पण कारखान्याने नुकत्याच संपलेल्या हंगामात अखेरच्या दिवसात आपली गाळप क्षमता वाढवून प्रती दिन २२०० ते २५०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. बंद पडलेला हा कारखाना सुरु झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.