कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून ऊसाला चांगला दर मिळू लागला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास यातून मदत मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्र जवळपास ३० हजार हेक्टरने वाढले आहे. साखर कारखान्यांकडून ऊस शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन, नद्यांतील बारमाही पाणी आणि सिंचन सुविधांमुळे दरवर्षी ऊस क्षेत्र वाढत आहे.
उसाचे लागवड क्षेत्र वाढल्याने जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांची रिफायनींग क्षमता वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. साखर कारखान्यांनी साखरेशिवाय इथेनॉल, विज उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आडसाली ऊस लागवड अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८८ हजार हेक्टरमध्ये ऊस लागवड झाली आहे. तर २०२१-२२ मध्ये १ लाख ६० हजार हेक्टर आणि त्यानंतर २०२२-२३ मध्ये १ लाख ७६ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक घेण्यात आले. या वर्षी यामध्ये १२ ते १३ हजार हेक्टर क्षेत्र आणखी वाढले आहे.