निलंगा : अंबुलगा बुद्रुक येथील गेले काही वर्षे बंद स्थितीत असलेला सहकारी साखर कारखान्याने यंदा यशस्वी गाळप हंगाम घेतला. कारखान्याने उसाला प्रति टन २५६५ रुपये इतका दर दिल्याची माहिती माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील- निलंगेकर यांनी दिली. कारखान्याने ३६५ रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी कारखान्यामार्फत प्रयत्न केले जातील, असेही आमदार संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सांगितले.
यावेळी ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील म्हणाले कि, कारखान्याच्या पहिल्याच गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रती टन २५६५ रुपये दर दिला आहे. आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी कारखाना प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. भविष्यात सीएनजी, इथेनॉल आणि खत निर्मिती प्रकल्प सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब शिंगाडे, दगडू सोळंके, शेषराव ममाळे, सत्यवान धुमाळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.