टोयोटा कॅमरी फक्त इथेनॉलवर चालणार, ऑगस्टमध्ये लॉन्च होणार: नितीन गडकरी

नवी दिल्ली : भारतात लवकरच कार आणि दुचाकी वाहने फक्त इथेनॉलवर चालतील आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने देखील एक मजबूत पर्याय असतील, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. रविवारी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, केवळ इथेनॉलवर चालणारी वाहने देशात लवकरच दाखल होतील, ज्याची सुरुवात या वर्षी ऑगस्टमध्ये टोयोटा कॅमरीपासून होईल. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पेट्रोल आणि डिझेल सारख्या महागड्या जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांव्यतिरिक्त इतर पर्यायी इंधनांवर वाहने चालवावीत, असे आवाहन मंत्री गडकरी यांनी केले.

भारतातील टोयोटा मोटरने इथेनॉल-आधारित फ्लेक्स-इंधनावर चालणाऱ्या पहिल्या कारची चाचणी सुरू केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणतात की, भारत आपले कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. तसेच ते म्हणाले की, इथेनॉलचा वापर पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरू शकते आणि ग्राहकांसाठी ते अधिक किफायतशीर ठरू शकते. आम्ही नवीन वाहने घेऊन येत आहोत, जी पूर्णपणे इथेनॉलवर चालतील, असे गडकरी म्हणाले. बजाज, TVS आणि Hero स्कूटर लवकरच 100% इथेनॉलवर चालतील, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणादरम्यान गडकरींनी घोषणा केली की, ते ऑगस्टमध्ये टोयोटा कॅमरी लाँच करणार आहेत, जी भारतातील पहिली कार आहे जी संपूर्णपणे इथेनॉलवर चालण्यास सक्षम असेल. 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकार पर्यायी इंधनावर अवलंबून असण्याचे प्रमुख कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती. गेल्या काही वर्षांत अनेक दरवाढीनंतर दोन्ही पारंपरिक इंधनांच्या किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

इथेनॉल हे मुळात इथाइल अल्कोहोल आहे जे मोलॅसिस, धान्य आणि शेतीच्या कचऱ्यापासून बनवले जाते. ICRA अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की इथेनॉल मिश्रण आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब भारतातील वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी हातात हात घालून जाईल, जे एकूण उत्सर्जनाच्या 15 टक्के योगदान देते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here