महाराष्ट्र: पाथर्डीनजीक इथेनॉल टँकर उलटला, आगीत जळून खाक

अहमदनगर : इथेनॉलची वाहतूक करणारा टँकर उलटून त्याला आग लागली. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रोडवरील केळवंडी परिसरात गुरुवारी ही घटना घडली. या भीषण अपघातात टँकरमधील प्रवासी महिलेसह दोघांचा भाजून मृत्यू झाला. तर चौघेजण जखमी झाले आहेत. अपघातात ट्रँकरचा सहचालक गणेश रामराव पालवे (वय ४२, रा. पालेवाडी) व सुरैया बशीर शेख (वय ४६ रा. माळी बाभूळगाव) यांचा मृत्य झाला. मुख्य चालक दादासाहेब केकान बचावला.
याबाबत महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला असलेल्या वळणावर हा इथेनॉल वाहतुकीचा टँकर उलटला. त्यानंतर लगेच त्याला आग लागली. हे पाहून परिसरातील नागरिक तेथे जमले. पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचा बंबही दाखल झाला. त्यांनी आग आटोक्यात आणली. टँकरमधील पाच जणांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले. मात्र, दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

अपघातात लहू सांडू पवार, सुमन लहू पवार, जगदीश जगन पवार, कोमल जगन पवार जखमी झाले. चालक केकान याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, हवालदार नितीन दराडे, राम सोनवणे,अल्ताफ शेख, सुहास गायकवाड, किशोर लाड, प्रल्हाद पालवे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here